Vijay Tamil Nadu Political Game : मी सत्तास्थापनेपासून कोणालाही कोणाला थांबवत नाही किंवा अडवत नाही, मी फक्त लोकशाहीचा पुरस्कार करतोय. कोणत्याही पक्षाकडे कितीही आमदार असू देत, मला हेडकाऊंडशी देणंघेणं नाही,फक्त बहुमत हवं. डीएमके-अण्णाद्रमुक एकत्र आले आणि त्यांनी बहुमत दाखवलं तर त्यांनाही संधी देईन… वेळ लागतोय म्हणून जो काही आमदारांचा घोडाबाजार होईल, पण अस्थिर सरकारला मी परवानगी देणार नाही… पुढचे 2-3 दिवस कोणी आले नाही आणि विजयकडे 118 आमदार नसतील काय? तर विजयनं फक्त मला 118 आमदारांचा पाठिंबा आहे.
जर त्यांच्याकडे आमदार नसतील आणि मी त्याला शपथ दिली तर तो आमदारांचा घोडेबाजार नाही का करणार? त्याला कशी परवानगी देऊ? आज-उद्या जो काही आमदारांचा घोडेबाजार झाला तर त्याच्याशी माझं देणंघेणं नाहीय… सोमवारपर्यंत जर कोणीच सत्तेसाठी आलं नाही तर काय करणार? इतर पर्यायांचा विचार करणार, त्यावर अजून विचार केला नाहीय पण कायदेशीर बाजू समजूनच निर्णय घेणार…” ही वाक्ये आहेत तमिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची.
118 आमदारांच्या पाठिंब्याचं अधिकृत पत्र द्या
“आधी बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 118 आमदारांच्या पाठिंब्याचं अधिकृत पत्र द्या, त्यानंतरच सत्तास्थापनेचा विचार केला जाईल,” या राज्यपालांच्या भूमिकेमुळं तामिळनाडूत सत्तास्थापनेचा दावा करणाऱ्या विजय थलपती यांच्यासमोर मोठा पेच निर्माण झालाय. सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरूनही विजय थलपती यांच्या TVK पक्षासमोर का उभं राहिलंय सत्तास्थापनेचं संकट? ‘विजय’ रथावर स्वार तरी राज्यपालांच्या हाती लगाम? पाहूयात, यावरचा हा स्पेशल रिपोर्ट… तामिळनाडूत कोण करतंय.
‘विजय’चा ‘पॉलिटिकल’ गेम?
रूपेरी पडद्यावर ब्लॉकबस्टर परफॉर्मन्स देणाऱ्या विजय थलपतीनं राजकीय पटलावर आपल्या पदार्पणातच छप्परफाड
परफॉर्मन्स दिला. द्रमुक आणि अण्णाद्रमुक सारख्या पक्षांना धूळ चारत आपल्या TVK पक्षाला तामिळनाडूतील सर्वाधिक जागा मिळवणारा नंबर वन राजकीय पक्ष बनवला. 234 पैकी 108 जागा जिंकून राजकीय पटलावरचा सर्वांत मोठा विजय मिळवला.
विजय यांचा हा दणदणीत विजय पाहून त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते, समर्थक, चाहते बेहद खूश झाले आणि आता आपला ‘हिरो’, आपला नेता राज्याच्या सर्वोच्चपदी म्हणजे मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर कधी एकदा जाऊन बसतोय याची प्रतीक्षा करू लागले पण झालं भलतंच! विजय यांच्या विजयरथानं विधानसभेची पायरी गाठली खरी पण त्यांचा रथ पायरीवरच अडवण्यात आला. सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी आपल्या पक्षाचे 108 आणि काँग्रेसचे 5 अशा एकूण 113 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र घेऊन राज्यपालांकडं गेलेल्या विजय यांच्या पदरी निराशा आली… आधी बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 118 आमदारांच्या पाठिंब्याचं अधिकृत पत्र द्या, त्यानंतरच सत्तास्थापनेचा विचार केला जाईल,” असं म्हणत तामिळनाडूच्या ‘विजय’ रथाला राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांनी लगाम कसला.











