Family Relationship : मुलगी ही बापासाठी प्रिन्सेस असते आणि बाप हाच मुलीसाठी तिच्या आयुष्यातील पहिला हिरो असतो…पण ज्या बापाने रक्ताचे पाणी करून, स्वतःच्या सुखाचा त्याग करून आपल्या तीन मुलींना शिकवले, त्यांना समाजात ताठ मानेने जगण्याइतके सक्षम केले, त्याच मुलींनी वृद्धापकाळात आपल्या जन्मदात्या पित्याला अनाथ आश्रमाच्या दारात सोडून दिले. ही केवळ एका वृद्ध पित्याची कहाणी नाही, तर आजच्या सुशिक्षित, आधुनिक आणि प्रगत म्हणवल्या जाणाऱ्या समाजाच्या संवेदनशून्यतेची आणि नैतिक अधःपतनाची अत्यंत हृदयद्रावक आणि संतापजनक वस्तुस्थिती आहे. हरियाणातील सोनिपत येथील एका वृद्धाश्रमात घडलेली ही घटना ऐकून नातेसंबंधांवरून विश्वास उडून जावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
वृद्ध वडिलांना मुलींनी वृद्धाश्रमात सोडले; मृत्यूनंतरही अंत्यसंस्काराला नकार ( Family Relationship )
तीन सुशिक्षित मुली, ज्या देशाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात आणि परदेशात अत्यंत सुखी आणि प्रतिष्ठित आयुष्य जगत आहेत, त्यांनी आपल्या वडिलांच्या मृत्यूसमयी आणि अंत्यसंस्काराला येण्यासही स्पष्ट नकार दिला. ‘आता बाबा गेले आहेत, तर आम्ही येऊन काय करणार?’ असे निर्लज्ज उत्तर देत मुलींनी वडिलांच्या अंत्यसंस्काराची किंमत अवघ्या ५१०० रुपयांत चुकती केली आणि वडिलांच्या चितेचा विधी व्हिडिओ कॉलवर पाहण्याची अजब मागणी केली. शिवचरण गुप्ता असे या दुर्दैवी पित्याचे नाव असून, त्यांच्या आयुष्याचा शेवट एका अनाथ आणि असहाय्य अवस्थेत झाला. हरयाणातलं हे भयानक प्रकरण नेमकं काय?
शिवचरण गुप्ता हे मूळचे हरियाणातील सोनिपतचे रहिवासी होते. मात्र, आयुष्याच्या पूर्वार्धात ते महाराष्ट्रात आले. महाराष्ट्रात त्यांनी कापड व्यवसायात नशीब आजमावले. सुरुवातीला त्यांचा व्यवसाय चांगला चालला. त्यांनी सन्मानाने आपले कुटुंब सांभाळले. त्यांना मुलगा नव्हता, केवळ तीन मुली होत्या. मुलाच्या जन्माची आस न धरता त्यांनी आपल्या तिन्ही मुलींना मुलापेक्षा जास्त प्रेम दिले आणि त्यांच्या शिक्षणात कोणतीही कसर सोडली नाही. मुलींना चांगले संस्कार मिळावेत, त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहाव्यात, यासाठी शिवचरण यांनी दिवस-रात्र कष्ट केले. व्यवसायातील उत्पन्नाचा मोठा हिस्सा त्यांनी मुलींच्या उच्च शिक्षणासाठी खर्च केला. त्यांच्या कष्टाचे फळ म्हणून तिन्ही मुली उच्चशिक्षित झाल्या. मोठी मुलगी शिक्षिका बनली, जिचे लग्न झाल्यानंतर ती नेपाळमध्ये स्थायिक झाली. दुसरी मुलगी निशा उत्तर प्रदेशातील आझमगढ येथे राहू लागली, तर सर्वात लहान मुलगी प्रिया देशाची आर्थिक राजधानी मुंबईत स्थायिक झाली. तिन्ही मुली आपापल्या संसारात सुखी आहेत आणि चांगल्या आर्थिक आणि सामाजिक लाईफ जगत होत्या.
हेही वाचा : E20 इंधन वाद : अमेरिकेच्या दबावामुळे भारतात इथेनॉल सक्तीचं?
व्यवसाय बुडाला आणि मुलींनी फिरवली पाठ ( Father Abandoned by Daughters )
परंतु, काळाचे चक्र फिरले आणि शिवचरण गुप्ता यांच्या आयुष्याला गळती लागली. महाराष्ट्रातील त्यांच्या कापड व्यवसायात त्यांना प्रचंड नुकसान झाले. व्यवसाय पूर्णपणे बुडाला आणि त्यांच्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला. आर्थिक परिस्थिती इतकी खालावली की, स्वतःचे घर चालवणेही त्यांना कठीण झाले. ज्या मुलींना त्यांनी शिकवून मोठे केले, त्यांच्याकडून या संकटसमयी मदतीची अपेक्षा होती. परंतु, जेव्हा बापाचे खिसे रिकामे झाले, तेव्हा मुलींनी आणि त्यांच्या परिवाराने शिवचरण यांच्याकडे पाठ फिरवली. व्यवसायातील अपयश आणि मुलींचे हे बदललेले रूप पाहून शिवचरण खचले. शेवटी, कोणताही पर्याय न उरल्याने ते आपली पत्नी मीना यांच्यासह सोनिपतला परत आले. मात्र, सोनिपतमध्येही त्यांना हक्काचा आडोसा मिळाला नाही. ज्या सोनिपतच्या मातीत ते लहानाचे मोठे झाले होते, तिथल्याच एका वृद्धाश्रमाचे दरवाजे त्यांच्यासाठी उघडावे लागले. सुमारे दीड वर्षांपूर्वी शिवचरण गुप्ता आणि त्यांची पत्नी मीना अत्यंत जड अंतःकरणाने वृद्धाश्रमात राहायला आले.
वृद्धाश्रमातील आयुष्य हे कोणत्याही स्वाभिमानी व्यक्तीसाठी सोपे नसते. शिवचरण आणि मीना यांनी एकमेकांचा हात धरून तो काळ कसातरी काढायला सुरुवात केली. मात्र, दुःख आणि मानसिक तणावाचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर झाला. वृद्धाश्रमात आल्यानंतर काही दिवसांतच शिवचरण यांच्या पत्नी मीना यांचे निधन झाले. मीना यांच्या निधनाने शिवचरण पूर्णपणे एकटे पडले. त्यांच्या आयुष्याचा एकमेव आधारही हिरावला गेला होता. पत्नीच्या जाण्यानंतर त्यांचे मानसिक स्वास्थ्य अधिकच बिघडले. ते दिवसभर अस्वस्थ असायचे. त्यांच्याकडे एक मोबाईल फोन होता, ज्याच्या माध्यमातून ते आपल्या मुलींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करायचे. मुलींनी आपल्याला भेटायला यावे, आपल्याशी दोन शब्द प्रेमाने बोलावेत, एवढीच त्यांची माफक अपेक्षा होती. सुरुवातीला मुली फोनवर जुजबी चौकशी करायच्या, पण हळूहळू त्यांनी फोन उचलणे आणि स्वतःहून फोन करणेही बंद केले. बापाचा फोन आला की काही ना काही कारण सांगून फोन ठेवला जायचा.
आजारी वडिलांना भेटायलाही मुली आल्या नाहीत ( Old Age Home )
गेल्या काही महिन्यांत शिवचरण गुप्ता यांची तब्येत प्रचंड खालावली. वयोमानानुसार होणारे आजार आणि त्यात लागलेली विरहाची धास्ती यामुळे ते अंथरुणाला खिळले. त्यांच्या शरीराने साथ देणे सोडले होते, मात्र त्यांचे डोळे वृद्धाश्रमाच्या मुख्य दरवाजाकडे लागलेले असायचे. कदाचित आपली एखादी मुलगी आपल्याला पाहायला येईल, या आशेवर ते प्रत्येक दिवस कटत होते. त्यांची प्रकृती चिंताजनक होत असल्याचे पाहून वृद्धाश्रमाच्या संचालकांनी आणि व्यवस्थापनाने सामाजिक जबाबदारी म्हणून त्यांच्या मुलींशी संपर्क साधला. मृत्यूच्या सुमारे वीस दिवसांपूर्वी वृद्धाश्रम चालकांनी तिन्ही मुलींना फोन करून स्पष्ट सांगितले की, तुमच्या वडिलांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे, डॉक्टरांनी आशा सोडली आहे, त्यामुळे तुम्ही तातडीने सोनिपतला या आणि त्यांना भेटून घ्या.
हा फोन गेल्यानंतरही तिन्ही मुलींच्या मनाला पाझर फुटला नाही. नेपाळमध्ये राहणाऱ्या मोठ्या मुलीने शाळेचे काम असल्याचे कारण पुढे केले, आझमगढच्या मुलीने कौटुंबिक अडचणींचे रडगाणे गायले, तर मुंबईत राहणाऱ्या लहान मुलीने प्रवासाचे अंतर आणि वेळेचे कारण दिले. प्रत्येकीने काही ना काही कारण सांगून वडिलांकडे येणे टाळले. वडिलांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत होती आणि दुसरीकडे मुलींच्या निष्ठुरतेची परिसीमा गाठली जात होती. आजारपण वाढल्यामुळे शिवचरण यांना फोनवर बोलणेही कठीण झाले होते, आणि दुसरीकडून मुलींचे फोन येणे पूर्णपणे बंद झाले होते. मृत्यूच्या आधी एकदा तरी मुलींचा चेहरा पाहावा, त्यांच्या डोक्यावरून हात फिरवावा, ही शिवचरण यांची शेवटची इच्छा होती. परंतु, त्या नराधम मुलींना आपल्या जन्मदात्यासाठी काही तास काढणेही शक्य झाले नाही. अखेर, मुलींची वाट पाहत पाहतच शिवचरण गुप्ता यांनी वृद्धाश्रमाच्या खोलीत आपले प्राण सोडले.
मृत्यूनंतर ५१०० रुपये पाठवून अंत्यसंस्काराची जबाबदारी संपवली ( Family Relationship )
शिवचरण गुप्ता यांच्या निधनानंतर वृद्धाश्रम प्रशासनाने पुन्हा एकदा त्यांच्या तिन्ही मुलींशी संपर्क साधला. बापाचा मृत्यू झाल्याचे ऐकूनही मुलींच्या डोळ्यात अश्रू आले नाहीत की त्यांच्या मनात पश्चात्ताप झाला नाही. वृद्धाश्रमाच्या संचालकांनी अतिशय संवेदनशीलतेने मुलींना विचारले की, जर तुम्ही तिघी अंत्यसंस्कारासाठी येत असाल, तर आम्ही तुमच्या वडिलांचा मृतदेह शासकीय रुग्णालयाच्या शवागारात सुरक्षित ठेवतो. तुम्ही आल्यानंतर सन्मानाने त्यांचा अंत्यविधी करा. कोणत्याही मुलासाठी किंवा मुलीसाठी ही अत्यंत भावनिक आणि शेवटची संधी असते. परंतु, या मुलींनी जे उत्तर दिले ते ऐकून वृद्धाश्रम चालकही सुन्न झाले. तिन्ही मुलींनी सोनिपतला येण्यास स्पष्ट नकार दिला. त्यांनी सांगितले की, आमच्याकडे सध्या अजिबात वेळ नाही. आम्ही एवढ्या लांबून येऊ शकत नाही.
यावरच त्या थांबल्या नाहीत, तर नेपाळमध्ये शिक्षिका असलेल्या मोठ्या मुलीने वृद्धाश्रमाच्या बँक खात्यावर ऑनलाइन पद्धतीने ५१०० रुपये पाठवले. तिने प्रशासनाला सांगितले की, हे पैसे ठेवा आणि वडिलांचे अंत्यसंस्कार जे काही विधी असतात ते उरकून घ्या. पैसे पाठवून तिने आपल्या कर्तव्याची इतिश्री केली. एका शिक्षिकेने, जी समाजाला नैतिकतेचे धडे देते, तिने आपल्या वडिलांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी ५१०० रुपयांची किंमत ठरवली. तिने वृद्धाश्रमाकडे आणखी एक मागणी केली की, जेव्हा तुम्ही अंत्यसंस्कार कराल, तेव्हा आम्हाला व्हिडिओ कॉल करा किंवा त्याचे व्हिडिओ आणि फोटो काढून आम्हाला पाठवा, जेणेकरून आम्हाला समजेल की अंत्यसंस्कार झाले आहेत. तंत्रज्ञानाच्या या युगात नात्यांचे किती विद्रूपीकरण झाले आहे, याचे हे जिवंत उदाहरण होते. चितेची आग आणि बापाचे जळणारे शरीर त्यांना प्रत्यक्ष पाहायचे नव्हते, तर मोबाईलच्या स्क्रीनवर एका सिनेमासारखे पाहायचे होते.
हेही वाचा : शिवसेना कुणाची? सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांचं ब्रह्मास्त्र, शिंदे गट अडचणीत?
व्हिडिओ कॉलवर पाहिला वडिलांचा अंत्यविधी ( Family Relationship )
वृद्धाश्रम चालकांनी मुलींच्या या नकारानंतर अत्यंत दुःखी मनाने स्वतःच शिवचरण गुप्ता यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. सोनिपतच्या स्मशानभूमीत वृद्धाश्रमाच्या कर्मचाऱ्यांनी आणि काही स्थानिक नागरिकांनी एकत्र येऊन शिवचरण यांच्या मृतदेहाला मुखाग्नी दिला. जो बाप आपल्या तिन्ही मुलींच्या खांद्यावर शेवटचा प्रवास करण्याची अपेक्षा बाळगून असेल, त्याला अनोळखी लोकांच्या खांद्यावर स्मशानभूमीत जावे लागले. अंत्यसंस्काराच्या वेळी मुलींच्या मागणीनुसार त्यांना व्हिडिओ कॉल करण्यात आला. मोबाईलच्या कॅमेऱ्यासमोर वडिलांची चिता जळताना तिन्ही मुलींनी आपापल्या घरात बसून पाहिली. हा क्षण जणू नात्यांना काळिमा फासणारा होता.
अंत्यसंस्कार झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे अस्थी गोळा करण्याचा विधी असतो. वृद्धाश्रम प्रशासनाने पुन्हा एकदा मुलींशी संपर्क साधला. त्यांनी सांगितले की, वडिलांचे अंत्यसंस्कार झाले आहेत, आता त्यांच्या अस्थी आम्ही सुरक्षित ठेवल्या आहेत. तुम्ही तिघी बहिणी पैकी कोणीतरी या आणि या अस्थी घेऊन पवित्र नदीत विसर्जित करा, जेणेकरून त्यांच्या आत्म्याला पूर्ण शांती लाभेल. यावर मुलींनी दिलेले उत्तर हे आधीच्या नकारापेक्षाही भयानक होते. मुलींनी सांगितले की, आता बाबा या जगात राहिलेच नाहीत, तर आम्ही तिथे येऊन काय करणार? आमचा येण्याचा वेळ आणि पैसा वाया जाईल. तुम्हीच त्या अस्थी घ्या आणि गंगेत विसर्जित करून टाका.
अस्थी विसर्जनालाही स्पष्ट नकार ( Father Abandoned by Daughters )
आम्हाला त्याची काहीही गरज नाही. ज्या मुलींना शिवचरण यांनी आपल्या हाताने घास भरवला, बोट धरून चालायला शिकवले, त्या मुलींना वडिलांच्या अस्थींना स्पर्श करण्याचीही लाज वाटत होती किंवा त्याची गरज वाटत नव्हती. मुलींच्या या अत्यंत क्रूर आणि संवेदनशून्य पवित्र्यानंतर वृद्धाश्रमाच्या संचालकांनी स्वतःच शिवचरण गुप्ता यांच्या अस्थी पवित्र गंगा नदीत विसर्जित करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी हरिद्वारला जाऊन संपूर्ण धार्मिक विधी आणि मंत्रोच्चारासहित शिवचरण गुप्ता यांच्या अस्थींचे विसर्जन केले, जेणेकरून त्या मृत आत्म्याला तरी शांतता लाभेल.
ही घटना समोर आल्यानंतर सोनिपत आणि संपूर्ण परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. समाजमाध्यमांवर या मुलींवर प्रचंड टीका होत आहे. शिक्षण माणसाला साक्षर बनवते, पण सुसंस्कृत बनवत नाही, हेच या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. आज आपण प्रगतीच्या मोठ्या मोठ्या गप्पा मारतो, चंद्रावर आणि मंगळावर जाण्याची स्वप्ने पाहतो, मात्र आपल्या घरातल्या वृद्ध आई-वडिलांना दोन वेळचे अन्न आणि प्रेमाचे दोन शब्द देऊ शकत नाही, ही आपली खरी सामाजिक स्थिती आहे.
शिवचरण गुप्ता यांनी आपल्या आयुष्यात काय चूक केली? त्यांनी आपल्या मुलींना शिकवले, हीच त्यांची चूक होती का? जर त्यांनी मुलींच्या शिक्षणावर खर्च करण्याऐवजी स्वतःच्या भविष्यासाठी, वृद्धापकाळासाठी काही पैसे वाचवून ठेवले असते, तर आज कदाचित त्यांच्यावर ही वेळ आली नसती, असा विचार आता सामान्य लोकांच्या मनात येऊ लागला आहे. ही प्रवृत्ती समाजासाठी अत्यंत घातक आहे.
वृद्ध पालकांची जबाबदारी आणि आजच्या पिढीसमोरचे प्रश्न ( Emotional Story )
कायद्याने वृद्ध माता-पित्यांच्या संरक्षणासाठी अनेक नियम केले आहेत, परंतु कायद्याने माणसाच्या मनातील संवेदनशीलता आणि प्रेम निर्माण करता येत नाही. जोपर्यंत माणसाच्या मनात आपल्या पालकांप्रती प्रेमाची भावना निर्माण होत नाही, तोपर्यंत अशा घटना घडतच राहतील. शिवचरण गुप्ता आज या जगात नाहीत, त्यांच्यावर वृद्धाश्रमाने अंत्यसंस्कारही केले आणि अस्थींचे विसर्जनही केले. परंतु, त्यांनी जाता जाता या सुशिक्षित समाजाच्या चेहऱ्यावरील बुरखा टराटरा फाडला आहे. पैशाच्या मागे धावणाऱ्या आणि नात्यांना ओझे समजणाऱ्या आजच्या पिढीसाठी ही घटना एक मोठी चपराक आहे.









