Jantar Mantar Protest: गेल्या काही दिवसांपासून जंतर मंतर सुरू असलेल्या आंदोलनात एक नवा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. अचानक रविवारी मध्यरात्रीनंतर सुरू झालेल्या घडामोडींमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
दिल्लीतील जंतरमंतर (Jantar Mantar Protest) येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान रविवारी मध्यरात्रीनंतर प्रशासनाच्या हालचालींना अचानक वेग आल्याने आंदोलनस्थळी तणावाचे वातावरण निमार्ण झाले. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करत परिसरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला.
आंदोलनस्थळी उपस्थित असलेल्या काही आंदोलकांनी मध्यरात्रीनंतर परिसरातील काही बॅरिकेड्स हटवण्यात आल्याचा तसेच काही सीसीटीव्ही कॅमेरे बंद झाल्याचा दावा केला आहे. मात्र, या दाव्यांबाबत प्रशासनाकडून अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
हेही वाचा: ‘या तीन अटी मान्य झाल्या तर उपोषण सोडेन’; सोनम वांगचूक यांची सरकारला ऑफर
आता सुरक्षा व्यवस्थेत वाढ
संसदेचे अधिवेशन सुरू होत असल्याने जंतरमंतर आणि आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. दंगल नियंत्रण पथक, जलद कृती दल आणि अन्य सुरक्षा यंत्राणांच्या तुकड्या तैनात आल्या असून, परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.
‘चलो संसद’च्या पार्श्वभूमीवर खबरदारी
आंदोलनकर्त्यांनी संसदेकडे मोर्चा काढण्याची भूमिका घेतल्याची माहिती समोर आल्यानंतर प्रशासनाने कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी अतिरिक्त उपाययोजना केल्या आहेत. सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा येऊ नये आणि संसदेच्या परिसरातील सुरक्षा अबाधित राहावी, यासाठी पोलिसांनी आवश्यक ती खबरदारी घेतल्याचे सांगितले जात आहे.
आंदोलकांचा आरोप
आंदोलनकर्त्यांनी प्रशासनावर आंदोलन कमकुवत करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. मध्यरात्री करण्यात आलेल्या हालचालींबाबत अनेक प्रश्न उपस्थित करत त्यांनी पारदर्शकतेची मागणी केली आहे. दुसरीकडे, पोलिसांनी सुरक्षा कारणास्तव करण्यात येणाऱ्या उपाययोजना नियमित प्रक्रियेचा भाग असल्याचे सांगितले आहे.
जंतरमंतर परिसरात तणाव
सध्या जंतरमंतर (Jantar Mantar Protest) परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस तैनात असून, परिस्थिती नियंत्रणात असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. आंदोलक आणि प्रशासन या दोघांकडूनही पुढील भूमिकेकडे लक्ष लागले असून, संसदेच्या अधिवेशनादरम्यान या आंदोलनाची दिशा काय असेल, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
दरम्यान, आंदोलनकर्त्यांच्या मागण्या आणि प्रशासनाची भूमिका यावर पुढील काही दिवसांत अधिक स्पष्ट चित्र समोर येण्याची शक्यता आहे.









