Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून मनोज जरांगे पाटील यांनी 1994 मधील ओबीसी आरक्षण निर्णयाच्या निकषांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे आरक्षणावरील वादाला नवे वळण मिळाले आहे. दरम्यान, भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी जरांगे पाटलांची भेट घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा केली.
छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या या भेटीत जरांगे पाटील यांनी स्प्ष्टपणे सांगितले की, मराठा समाज “ओबीसी आरक्षण मागत नाही, तर आपला हक्क मागत आहे.” त्यांनी दावा केला की अनेक मराठा कुटुंबांकडे शेती असूनही त्यांची आर्थिक परिस्थिती कमजोर आहे आणि त्यांना उपजीविकेसाठी ऊसतोडी, मजुरीसारखी कामे करावी लागतात.
हेही वाचा: प्रसाद लाड आणि मनोज जरांगे भेटीत भावनिक क्षण; मराठा आरक्षणावर चर्चा, नेमकं काय घडलं?
जरांगे पाटील यांनी ओबीसी आरक्षणाच्या मूळ निकषांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत विचारले की, “१९९४ मध्ये ओबीसींना आरक्षण कोणत्या आधारावर दिले गेले? तसेच मराठा समाजाला अनेकदा मागास ठरवूनही आरक्षण का मिळत नाही, असा सवाल त्यांनी केला.
त्यांनी आणखी आरोप करत म्हटले की, मराठा समाजाकडे असलेल्या “गॅझेट” आणि नोंदी असूनही त्यांना सरसकट प्रमाणापत्र दिले जात नाही. तसेच ओबीसींची संख्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात कशी वाढली, यावरही त्यांनी शंका व्यक्त केली.
या चर्चेदरम्यान त्यांनी मंडळाच्या सर्व्हे पद्धतीवरही प्रश्न उपस्थित करत “नेमका कोणता सर्व्हे झाला आहे, तो सार्वजनिक करावा,” अशी मागणी केली.
या घडामोडींमुळे मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक चर्चा तीव्र झाली आहे.












