• Home
  • राजकारण
  • कृषीमंत्र्यांच्या विधानाने शेतकऱ्यांमध्ये खळबळ; “समाधान सगळ्यांचंच होणार नाही”
Top News

कृषीमंत्र्यांच्या विधानाने शेतकऱ्यांमध्ये खळबळ; “समाधान सगळ्यांचंच होणार नाही”

Agriculture Minister statement farmers
Agriculture Minister statement farmers : राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अटी-शर्तींमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. या योजनेच्या जाचक अटींविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विधानाने चर्चेला उधाण आले आहे.
मंत्री भरणे म्हणाले, “शेतकऱ्यांनाही आश्वासित करतो की, मी खरंच सांगतो की समाधान सगळ्यांचंच होणार नाही पण खूप मोठी घोषणा शेतकऱ्यांसाठी केलेली आहे.” या विधानाने शेतकरी संघटनांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. तिजोरीवर ताण असतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतल्याचे भरणे यांनी सांगितले.

दोन मुख्य अटींमुळे लाखो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहण्याची शक्यता

सरकारने कर्जमाफीसाठी दोन मुख्य अटी १०० टक्के ठेवल्या आहेत. यामुळे अनेक शेतकरी या योजनेच्या फायद्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. याविरोधात रोहित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात सातबारा कोरा करण्याच्या मागणीसह अन्नत्याग आंदोलन सुरू केले. “जाचक अटी मागे घेतल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही,” अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे.

त्यांच्या मागण्या समजावून घेऊन आणि योग्य तो मार्ग काढू

कृषिमंत्री भरणे यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेतली. ते म्हणाले, “काल रात्री रोहित पवारांशी दोन वेळा फोनवर बोललो. मुख्यमंत्र्यांशीही चर्चा केली. मंगळवारी रोहित दादांसोबत बैठक बोलावली आहे. त्यांच्या मागण्या समजून घेऊ आणि योग्य तो मार्ग काढू.” रोहित पवार यांच्या निवेदनावरही ते म्हणाले, “ते मी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार आहे. मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील, यात मला विश्वास आहे.

समाधान सगळ्यांचेच होणार नाही – कृषीमंत्री भरणे

भरणे यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले की, सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे आहे. मात्र, “समाधान सगळ्यांचंच होणार नाही,” या वाक्याने वाद निर्माण झाला आहे. काही शेतकरी नेते म्हणतात की, आधीच आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांना अशा विधानाने निराशा येते. कर्जमाफी ही केवळ राजकीय घोषणा न राहता प्रत्यक्षात सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

बैठकीतून काय तोडगा काढला जातो याकडे सर्वांचे लक्ष

राज्यातील शेतकरी संघटना आणि विरोधक सरकारच्या या योजनेच्या अटी शिथिल करण्याची मागणी करत आहेत. मंगळवारची बैठक किती प्रभावी ठरते आणि सरकार कोणते सकारात्मक बदल करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या तरी शेतकऱ्यांमध्ये आशा आणि संशय यांचे मिश्रण दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts