Manoj Jarange: मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पहिल्यांदाच थेट आणि तीव्र शब्दांत टीका केली आहे. शिंदे हे दुहेरी भूमिका घेत असून त्यांनी विश्वासघात केल्याचा आरोप जरांगे यांनी केला. काही घडामोडी पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याचाही दावा त्यांनी यावेळी केला.
मराठा आंदोलन (Maratha Reservation) सुरू झाल्यापासून जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याबाबत संयमाची भूमिका घेतली होती. मात्र, आता त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत शिंदे यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. भुमरे यांच्या राजकीय प्रवासात मराठा समाजाने मोठे योगदान दिले, मात्र त्याची परफेड अशी केली जात आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसेच, ” तात्पुरते निर्णय घ्या आणि नंतर रद्द करा,” अशी भूमिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंडळाचा उल्लेख करत त्यांनी सरकारवर टीका केली. देवेंद्र फडणवीस या विषयावर मौन बाळगत असल्याने त्यांचीही संमती असल्याचा आरोप जरांगे यांनी केला.
एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप
संजय सिरसाठ यांच्याशी संबंधित घडामोडींचा उल्लेख करत, या संपूर्ण प्रकरणामागे एकनाथ शिंदे यांचाच हात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. तसेच, परिस्थिती अशीच राहिली तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबद्दल चांगले बोलण्याची वेळ येईल, असे वक्तव्य करत त्यांनी शिंदे यांच्यावर निशाणा साधला. ” तुमच्या गद्दारीचा डाग आम्ही पुसला, पण आता आमच्याच समाजातील तरुणांचे राजकीय नुकसान केले जात आहे,” अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी जरांगे यांनी शिंदे यांना थेट इशारा देत, “आमच्या संयमाची परीक्षा पाहू नका. गरज पडली तर तुमचे सर्व लोक राजकीयदृष्ट्या पराभूत करू,” असा इशारा दिला. त्यांच्या या वक्तव्यामुळे सध्याचे राजकीय वातावरण (Maharashtra Politics) आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
जरांगे म्हणाले की…
एकनाथ शिंदे यांच्याकडून अशा प्रकारच्या भूमिकेची अपेक्षा नव्हती, असे सांगत जरांगे म्हणाले की, “आणखी किती दिवस दुहेरी भूमिका घेणार? मी कोणाच्याही दबावाखाली येणार नाही. गरज पडली तर जेलमध्ये जाण्यालाही तयार आहे.” यावेळी त्यांनी बावनकुळे आणि फडणवीस यांच्यावरही टीका करत अनेक प्रश्न उपस्थित केले.
याशिवाय, शिंदे गटातील नेत्यांच्या गुप्त बैठका सुरू असल्याचाही आरोप त्यांनी केला. मराठा आंदोलनाच्या सुरुवातीपासून प्रथमच त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर इतक्या कठोर शब्दांत हल्लाबोल केला. “एकदा एखादी गोष्ट मनात घेतली तर मागे हटत नाही,” असे सांगत त्यांनी पुन्हा एकदा शिंदे यांना इशारा दिला. तसेच मंत्रालयातून बसून कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्याचे प्रयत्न होत असल्याचाही आरोप त्यांनी यावेळी केला.








