PM Narendra Modi Appeal : सध्या संसदेत ‘नारी शक्ती वंदन कायद्या’तील दुरुस्तीसंदर्भात जोरदार चर्चा सुरु आहे. ही चर्चा इतकी वेळ चालली की, काल रात्री 1 वाजेपर्यंत सभागृहाचं कामकाज सुरु होतं. या विधेयकावर लोकसभेत लवकरच मतदान होणार आहे. मतदानाच्या अगदी आधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक विरोधी खासदार आणि सर्व राजकीय पक्षांना भावनिक आवाहन केलं. ते म्हणाले, “मी सर्व सदस्यांना विनंती करतो की, महिलांच्या भावना दुखावतील असं काहीही करु नका.” पंतप्रधान मोदींनी खासदारांना आठवण करुन दिली की, देशभरातील लाखो महिला आज आपले हेतू आणि निर्णय पाहत आहेत.
हेही वाचा : संसदेत चर्चा सुरु असताना मध्यरात्री महिला आरक्षण कायदा अंमलात; अधिसूचना
काय म्हणाले मोदी :
सोशल मीडियावर पोस्ट करत पंतप्रधान मोदी म्हणाले की, या विधेयकाबद्दल पसरवलेल्या गैरसमजांना तार्किक उत्तरं देण्यात आली आहेत आणि प्रत्येक शंकेचं निरसन करण्यात आलं आहे. ज्या सदस्यांकडे माहितीचा अभाव होता, त्यांना संपूर्ण माहिती पुरवण्यात आली आहे, जेणेकरुन विरोधाला कोणतीही संधी राहणार नाही. पंतप्रधान मोदींच्या मते, गेल्या चार दशकांपासून देशात महिला आरक्षणाच्या मुद्द्याचं अत्याधिक राजकारण झालं आहे. देशाच्या निम्म्या लोकसंख्येला त्यांचे हक्क मिळण्याची वेळ आली आहे. स्वातंत्र्याला इतकी वर्षे उलटूनही निर्णय घेण्याच्या पदांवरील महिलांची संख्या इतकी कमी असणं, हे पूर्णपणे अस्वीकार्य आहे.
राजकीय पक्षांना योग्य विचार करण्याचं आवाहन :
मतदानाच्या अगदी आधी, पंतप्रधानांनी सर्व राजकीय पक्षांना योग्य विचार आणि संवेदनशीलतेनं निर्णय घेण्याचं आणि महिला आरक्षणाच्या बाजूनं मतदान करण्याचं आवाहन केलं. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की, सभागृहाच्या कोणत्याही सदस्यानं महिलांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचेल असं काहीही करु नये. हा केवळ एक कायदेशीर बदल नाही, तर देशभरातील लाखो महिलांच्या अपेक्षांशी संबंधित एक निर्णय आहे.
महिलांना सक्षम करण्याची गरज :
पंतप्रधान मोदींनी आपल्या आवाहनात यावर जोर दिला की, देशातील माता आणि भगिनींना आता आणखी वाट पाहायला लावता येणार नाही. त्यांनी सर्व खासदारांना एकत्र येऊन ‘नारी शक्ती वंदन कायद्या’तील दुरुस्तीला पाठिंबा देण्याचं आवाहन केलं. आता जगभरातील आणि देशातील लाखो महिला त्यांचे प्रतिनिधी संसदेत काय निर्णय घेतात हे पाहत आहेत. ही अशी वेळ आहे जेव्हा आपल्याला राजकारणाच्या पलीकडे जाऊन देशातील महिलांना सक्षम करण्याची गरज आहे.











