Savji Mutton : विदर्भाची पारंपरिक खाद्यसंस्कृती असलेल्या प्रसिद्ध सावजी मटणावरून सध्या संपूर्ण महाराष्ट्रात एक मोठा वाद पेटला आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन विभाग अर्थात एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सावजी जेवणाबाबत केलेल्या एका विधानामुळे या वादाला फोडणी मिळाली असून, त्यावर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट आणि आक्रमक शब्दांत पलटवार केला आहे. प्रशासकीय शिस्तीसाठी ओळखले जाणारे धडकनिशी अधिकारी तुकाराम मुंढे आणि विदर्भाच्या अस्मितेचे प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यातील या थेट संघर्षामुळे हा केवळ खाण्यापिण्याचा विषय न राहता त्याला तीव्र राजकीय रंग चढला आहे. सोशल मीडियापासून ते थेट विदर्भातील रस्त्यांवर आणि हॉटेल व्यावसायिकांमध्ये या विधानावरून प्रचंड संतापाची लाट पसरली आहे. काय आहे हा टोटल घोळ, पाहूयात…
तुकाराम मुंढेंनी सावजी मटणाबाबत नेमकं काय म्हटलं? ( Savji Mutton )
हा संपूर्ण वाद अमरावती येथे आयोजित एका सार्वजनिक कार्यक्रमापासून सुरू झाला. अन्न व औषध प्रशासन विभागाची धुरा सांभाळत असलेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे हे नेहमीच नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि भेसळयुक्त अन्नपदार्थांवर कडक कारवाई करण्यासाठी ओळखले जातात. अमरावतीच्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी लोकांच्या खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि आरोग्यावर होणारे त्याचे दुष्परिणाम या विषयावर भाष्य केले. अति तेलकट, अतितिखट आणि मसालेदार पदार्थांमुळे मानवी शरीराला, विशेषतः हृदयाला कसा गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, हे ते समजावून सांगत होते. हे सांगताना त्यांनी नागपूर आणि विदर्भाच्या खाद्यसंस्कृतीचा प्राण मानल्या जाणाऱ्या सावजी मटणाचे उदाहरण दिले.
आपल्या रोखठोक शैलीत बोलताना तुकाराम मुंढे म्हणाले की, जर माझ्यासारख्या माणसाने नागपूरचे ते प्रसिद्ध सावजी जेवण जेवले, तर अति तिखट आणि तेलकट असल्यामुळे मी किमान एक महिना आजारी पडेन आणि मला थेट हॉस्पिटलमध्ये भरती व्हावे लागेल. एवढ्यावरच न थांबता त्यांनी अशा प्रकारच्या ऑईली फूडमुळे हार्ट अटॅक येऊ शकतो, असा इशारा देत नागरिकांना आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलण्याचा आणि जिभेवर ताबा ठेवण्याचा सल्ला दिला. तुकाराम मुंढेंचे हे वक्तव्य सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरले आणि त्याचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला. हा व्हिडिओ समोर येताच विदर्भातील नागपूर, अमरावती, यवतमाळसह अनेक जिल्ह्यांमध्ये यावर अत्यंत तीव्र आणि आक्रमक प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली.
हेही वाचा : नंदुरबारमध्ये 200 मुलांवर अत्याचार, 22 वर्षीय आरोपीला अटक
सावजी हॉटेल व्यावसायिक आणि विदर्भातून संतापाची प्रतिक्रिया ( Savji Mutton )
विदर्भातील पारंपरिक हलबा कोष्टी समाज आणि सावजी हॉटेल व्यावसायिक या विधानामुळे कमालीचे संतापले. सावजी ही केवळ एक डिश किंवा केवळ मटणाचा प्रकार नसून, ती विदर्भाची अनेक पिढ्यांची संस्कृती, परंपरा आणि अस्मिता आहे, अशी भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली. हलबा समाज युवा संघटनेने मुंढेंच्या या विधानाचा जाहीर निषेध केला आणि त्यांच्या विरोधात निदर्शने सुरू केली. अनेक हॉटेल मालकांनी मुंढेंना लक्ष्य करत म्हटले की, स्वतःच्या प्रसिद्धीसाठी आणि चमकोगिरीसाठी अशा प्रकारे एका मोठ्या पारंपरिक उद्योगाला बदनाम करणे अत्यंत चुकीचे आहे. नागपूरच्या काही हॉटेल व्यावसायिकांनी तर थेट तुकाराम मुंढेंना कायदेशीर नोटीस बजावली असून, त्यांना जाहीर माफी मागण्याचे खुले आव्हान दिले आहे, अन्यथा न्यायालयात खेचण्याचा इशारा दिला आहे.
हा वाद जेव्हा लोकभावनेशी आणि प्रादेशिक अस्मितेशी जोडला गेला, तेव्हा यात राजकारण्यांनी उडी घेतली. विदर्भातील चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणात थेट एन्ट्री घेत तुकाराम मुंढेंच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. मुंबईत पत्रकारांशी बोलताना बावनकुळे यांनी अत्यंत कडक शब्दांत मुंढेंना तंबीच दिली. बावनकुळे म्हणाले की, सावजी हा विदर्भाचा ब्रँड असून ती आमची शान आहे. विदर्भामध्ये गेली तीन ते चार पिढ्यांपासून हजारो कुटुंबे अत्यंत प्रामाणिकपणे सावजी रेस्टॉरंट्स चालवत आहेत आणि हा केवळ एक हॉटेली व्यवसाय नसून घराघरात बनवला जाणारा एक मोठा गृहउद्योग आहे. या व्यवसायावर हजारो लोकांचे पोट अवलंबून असून तो त्यांच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधन आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांच्या अशा सरसकट वक्तव्यांवर तीव्र आक्षेप नोंदवला. ते म्हणाले की, कोणत्याही जबाबदार अधिकाऱ्याने संपूर्ण उद्योगाला बळीचा बकरा बनवू नये. रेस्टॉरंट्स बंद पडतील किंवा या व्यवसायाला कायमचा फटका बसेल अशी नकारात्मक विधाने करणे अधिकाऱ्यांना शोभत नाही. बावनकुळे यांनी अधिक स्पष्टपणे भूमिका मांडताना सांगितले की, जर एखाद्या विशिष्ट हॉटेलमध्ये अन्नात भेसळ आढळली, अस्वच्छता असेल किंवा आरोग्याला धोका निर्माण करणारी गोष्ट असेल, तर कायद्यानुसार तिथे खुशाल कडक कारवाई करा, त्याला कोणाचाही विरोध असणार नाही. परंतु, एका जागेवरील कारवाई किंवा वैयक्तिक मताचा आधार घेऊन संपूर्ण सावजी पाककलेला आणि विदर्भाच्या परंपरेला बदनाम करण्याचा अधिकार कोणालाही नाही. आज केवळ देशातच नव्हे, तर जगभरातील अनेक देशांमध्ये सावजी मसाल्याची आणि चवीची मोठी मागणी असताना असे बेजबाबदार विधान करणे अत्यंत दुर्दैवी आहे.
‘माफी मागण्याचा प्रश्नच नाही’; मुंढे आपल्या वक्तव्यावर ठाम ( Tukaram Mundhe )
चौफेर टीकेची झोड उठल्यानंतर अखेर आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी या संपूर्ण प्रकरणावर आपली रोखठोक आणि स्पष्ट भूमिका मांडली आहे. पुण्यात माध्यमांशी बोलताना त्यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला असला, तरी ते आपल्या विधानावर ठाम राहिले. मुंढे यांनी अत्यंत स्पष्ट शब्दांत सांगितले की, मी केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागण्याचा अजिबात प्रश्नच उद्भवत नाही, कारण माझा उद्देश कोणत्याही खाद्यसंस्कृतीचा, समाजाचा किंवा व्यवसायाचा अवमान करण्याचा मुळीच नव्हता. त्यांनी आपल्या विधानाचा विपर्यास झाल्याचा दावा केला आणि ते पूर्णपणे त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे स्पष्ट केले.
आपल्या भूमिकेचे समर्थन करताना तुकाराम मुंढे ( Tukaram Mundhe ) यांनी एका जुन्या आठवणीचा आणि वैयक्तिक अनुभवाचा आवर्जून उल्लेख केला. ते म्हणाले की, २००८-०९ च्या सुमारास मी जेव्हा नागपूरला होतो, तेव्हा एका मित्रासोबत मी पहिल्यांदा सावजी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी गेलो होतो. परंतु, ते जेवण इतके अतितिखट आणि तेलकट होते की, मला फक्त एकच घास घेता आला आणि त्यानंतर मी जेवणे थांबवले. त्या जेवणामुळे पुढे माझी तब्येत बिघडली आणि तीन दिवस मला प्रचंड त्रास सहन करावा लागला. त्यामुळे अमरावतीच्या कार्यक्रमात मी जे काही बोललो, तो केवळ माझा वैयक्तिक अनुभव होता. अन्न हा पूर्णपणे प्रत्येकाच्या वैयक्तिक आवडीनिवडीचा आणि शारीरिक क्षमतेचा विषय आहे. मला वैयक्तिकरीत्या तिखट-तेलकट अन्न सोसत नाही, म्हणूनच मी ते मत मांडले. मी कोणत्याही नागरिकाला सावजी मटण खाण्यापासून रोखलेले नाही किंवा ते खाल्ल्याने प्रत्येक माणूस आजारी पडेल, असा कोणताही दावा केलेला नाही, असे स्पष्टीकरण मुंढेंनी दिले.








